Thursday, August 3, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ४ )

संकट व माणूस यांचा संबंध फारच जवळचा आहे. संकट मग ते निसर्ग निर्मीत असते अथवा मानव निर्मीत . यामध्ये उध्वस्त होत असते ती सामान्य जनता. संकटकाळी लोकांच्या आधाराला धावून जाणे हे लोकोत्तर राज्यकर्तेचे खरे लक्षण असते. संकटाला देखील भारतीय जीवनात आर्थिक धार्मिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक छटा असतात व त्या कधीकधी फारच ठळक असतात. संकटात सापडलेल्या माणसांना पुन्हा नव्या दमाने उभे करणे हे समाजाचा मुख्य घटक व जबाबदार सेवक म्हणून राज्यकर्त्या लोकांची जबाबदारी असते. ही जबाबदारी माझ्या शाहूराजाने चोख बजावली होती म्हणून तर हा लोकोत्तर राजा आज समाजाच्या आदर्शस्थानी आहे. घटना प्रसिध्द आहे पण त्या घटनेकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले तर काय दिसते अथवा सापडते ?? पाहूया....

गंगाराम कांबळे ...हे नाव महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या महत्त्वाच्या कालखंडातील ठळकपणे उठून दिसणारे नाव. पाणी भरायला गेलेल्या गंगाराम नावाच्या इसमाला मारहाण झाली. ही गोष्ट शाहूंना समजताच त्यांनी आपला " खरा बाणा " तिथे कृतीशील केला. महत्त्वाचे हे की , या घटनेनंतर गंगाराम कांबळेना " सत्यसुधारक हाँटेल " काढून दिले. तिथे स्वतः चहा पिण्यासाठी जाण्याचा धाडशी प्रयोग यशस्वी केला. आपल्या बरोबर असणाऱ्या सर्वजातीयधर्मीय लोकांना जाणीवपूर्वक गंगारामच्या हातचा चहा पाजला. अवमानीत झालेल्या गंगारामना पुन्हा सन्मानपूर्वक समाजात स्थापीत करण्याची शाहूराजाची कला व कौशल्य कोटी वेळा प्रणाम करण्यासारखे आहे. ,...या घटनेतून नेमके काय कळते ? मला असे वाटते की , शाहूराजाने सामाजिक व धार्मिक अंगाने आलेल्या संकटात पिळून गेलेल्या गंगाराम कांबळे नावाच्या एका माणसाचे जाणीवपूर्वक व सन्मानपूर्वक केलेले पुनर्वसन. घटना घडत असतात. प्रशासन आपल्या परीने त्या हाताळत असतात. पण हाताळणारे हात जर हृदयाशी नाते सांगत नसतील तर " सहकार्य म्हणजे देखावा " ठरतो. आपल्या आजूबाजूला बघा जरा....पुनर्वसन करा अशी आरोळी वर्षानुवर्षे ठोकणारे धरणग्रस्त बांधव , भुकंपासारख्या नैसर्गिक संकटात सापडून सर्वस्व गमावलेले किल्लारीसारखे प्रांत अथवा अगदी पूरग्रस्त समाज , भोपाळ वायूकांडातील होरपळलेला समाज...एक  ना अनेक उदाहरणे दाखवता येतात. आमचे राज्यकर्ते " हाताने " मदत केल्याचा देखावा करतात पण ती मदत " हृदयापासून " नसल्याने वर्षानुवर्षे पुनर्वसन होत नाही. माणूस व माणसांची वस्ती उध्वस्त होत जाते आणि इकडे राज्यकर्ते हृदयाला कुलूप घालून बसल्याने त्यांच्या अंतरंगात " मायेची ऊब " निर्माण होतच नाही. धरणग्रस्त , पूरग्रस्त अथवा भूकंपग्रस्त , विषारी वायूग्रस्त यांचे हाल संपत नाहीत कारण ....कारण त्यांच्यावर प्रशासनाव्दारे " मायेची पारख " करणारा एक शाहूराजा नसतो.

लोक अथवा लोकवस्ती , कोणत्याही कारणाने का असेना , पण उध्वस्त होत असताना शासन करणारे राज्यकर्ते जर हृदयाने मदत करत नसतील तर " तेच सर्वात मोठे संकट " असते. हक्काने घ्यायची गोष्ट हतबलतेने अथवा याचकरुपाने घेणे यात सन्मान रुजत नसतो. शाहूराजानी गंगाराम कांबळे यांना हाँटेलकरता आर्थिक मदत देऊन थांबले नाहीत तर त्यांचा सामाजिक सन्मान परत मिळावा व त्यांचे पुनर्वसन व्हावे या उद्देशाने स्वतः हाँटेलात जाऊन चहा पिण्याचा रिवाज पाडला. आमचे राज्यकर्ते कधीतरी धरणग्रस्त , पूरग्रस्त , वायूग्रस्तांकडे स्वतः जाऊन त्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी झटणार का ?? माझ्या समोर प्रश्न आहे. " माणूस सन्मानाने उभा करा " हेच तर शाहूचरित्र सांगत असते...

!! पुनर्वसन....हेच असते , संकटग्रस्तांना मुख्य आधार !!

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? या लेखमालिकेतील सर्व लेख फक्त एका क्लिक वर .

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १ )
शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग २ )
शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ३ )
 
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

Tuesday, August 1, 2017

शाहूचरित्र ....काय शिकवते ? ( भाग ३ )

   सामान्य जनता व राज्यकर्ते यांच्यातील कोणत्याही प्रकारचे अंतर खरे तर असू नये. हूशार व प्रजेची काळजी वाहणारा नेता हा नेहमीच लोकांच्यात वावरतो. बेधडक मिसळतो. सामान्य माणसाला तो कायमचा उपलब्ध असतो. या कारणाने नेता व सामान्य जनता यांच्या मध्ये विश्वासाची एक नाळं तयार होते. लोक आपल्या नेत्याला थेट भेटू शकतात. तै नेता कितीही मोठा होवो पण..पण तो माणूस म्हणून आजही आपल्यातलाच आहे ही विश्वासार्हता निर्माण होते ते अशाच प्रकारे. शाहूराजाने आयुष्यभर अशी विश्वासार्हता मिळवली , टिकवली व उत्तरोत्तर ती वाढतच गेली. एक नजर या उदाहरणावर टाकुया...

( हे पण वाचा शाहूचरित्र ....काय शिकवते ? ( भाग २) )

*शाहूराजा...हा सोनतळी या आपल्या ठिकाणाहून निघताना व इतरही बरेचदा " खडखडा " नावाच वाहन वापरत. खडखडा म्हणजे ज्याच्या चाकांचा आवाज खाडखाड निघतो असे वाहन. या वाहनाला पुढे आठ घोडी जुंपलेली असत. फारच लांबीला असणारा हा खडाखडा म्हणजे शाहूराजाच्या आगमनाची वर्दी असायची. सामान्य लोक या वाटेवर महाराजांची वाट बघत थांबायची. शाहूराजा सोनतळीवरुन निघताना वाटेत भेटणारे प्रत्येक नागरिकाला खुशाली विचारत. या खडखड्यामध्ये आपल्या बरोबर इतर नागरिकांना बसवून फिरवत. कोणत्याही जातीधर्माचे इथे वावडे नव्हते. महाराजांच्या अनेक अव्दितीय कामाचा हा खडखडा साक्षीदार आहे. " राजा आपल्या सुखदुःखाला कायमचा उपलब्ध आहे " ही सार्थ भावना रुजवणेत शाहूराजे यशस्वी ठरले आणि म्हणूनच जगातील सर्वोत्तम राजात गणले गेले. " राजर्षी " ही उपाधी फक्त शाहूराजाच्या पुढे लागते त्याला कारण हेच. ....आजकालचे आमचे राजकारणी कसे वागतात हो ? सरपंच पासुन प्रधानमंत्री पर्यत जरा नजर लावा. एखाद्या आमदाराच्या गाडीमागे आणखी चार गाड्या त्याच्या खूशमस्करी करणाऱ्या भांडांच्या असतात. एखाद्या मंत्र्याचा दौरा असेल तर वाहनांची रांग मोठी असते व खास त्याच्या वाहनाला पुढे जाऊ देण्याकरता इतर सामान्य लोकांची वाहने बराच वेळ रस्त्यावर अडवली जातात. मंत्र्याचा तो " ताफा " असतो. अशामुळे म्हणे यांची " प्रेस्टीज " वाढते. खरेतर याच कारणाने या लोकप्रतिनिधी व सामान्य जनते मध्ये अंतर पडत जाते,हे सत्य त्यांना समजेल तो सुदिन...*

लोकांच्यात जो मिसळतो व वावरतो तो लोकप्रतिनीधी नेहमीच स्मरणात राहतो. कितीही वर्षे तुम्ही आमदार अथवा मंत्री असा , जोपर्यंत तुमच्या वाहनाच्या काचा खाली होत नाहीत व तुम्ही सामान्य लोकांना किमान दृष्टीला पडत नाहीत तोवर ही लोक " जनप्रतिनिधी " नसतात हेच खरं. शाहूचरित्र ....हे आपणांस दाखवून देते.

*!! संपर्क ठेवा जनतेशी...तरच असाल " जनप्रतिनिधी " !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

( हे पण वाचा शाहूचरित्र ....काय शिकवते ? ( भाग १ ) )

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...