Monday, September 4, 2017

शाहूचरित्र ....काय शिकविते ?? ( भाग २६ )

उत्कृष्ट रत्न समुद्राच्या तळाशी पडून राहतात असे एका इंग्रजी कवितेत वाक्य आहे. खरं तर अशी रत्ने पारखून त्यांचा उपयोग जनहितार्थ करण्याचे कौशल्य ज्या नेतृत्वजवळ असते ते नेतृत्व निश्चिंत जगू शकते व रयतेला जगवू शकते. शाहूराजा हा असाच रत्नपारखी माणूस. आपल्या संस्थानात उत्त्मोत्तम माणसे आणून त्यांना लोकहितार्थ काम करून घेणे हे कौशल्य महाराजांनी उत्तम साध्य केले होते . म्हणून तर कोल्हापूर सर्वाँगाने बहरले , फुलले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी रत्ने मिळवण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्नही दाद देण्याजोगे व आदरभाव वाढविणारे आहेत. पाहूया एक असाच प्रयत्न ....

*महाराजांच्या दंतवैद्याची ही गोष्ट ...डाँ. विश्वनाथ काटे हे दंतवैद्य होते. रायबागमधील शिकारीवेळी महाराजांची व काटे डाँक्टर यांची गाठ पडली. काटे अत्यंत इमानाने काम करत. त्यांच्या विषयी गावकरी लोकाचेही मत चांगले होते. फक्त एक दोष होता अन् तो म्हणजे डाँक्टर काट्यांना असणारे बाटलीचे व्यसन. हे दारुपान सोडले तर डाँक्टर चांगले आहेत असे लोक बोलत. महाराज यावर काही बोलले नाहीत. महाराज डाँक्टरांशी अत्यंत प्रेमान वागत. गाडीतून फिरायला नेत. चर्चा करत. गप्पा मारत. कधीकधी सल्ला घेत. संध्याकाळी जेवायला बरोबर घेऊन बसत. महाराजांच्या अगदी शेजारी डाँक्टराचे ताट असायचे. दिड महिन्यांनी महाराजांनी विषय काढला." काटे , तुम्ही दारु पिताय हे खरं का ?? महाराजांनी विचारले . हो , घेत होतो असे डाँक्टर बोलले. पण....पण गेल्या दिड महिन्यात दिवसरात्र आपण आपल्या जवळ ठेवून घेतल्याने मला पिण्याच्या संधीच मिळाली नाही . जेवायचे अगोदरच वेळ अशी,गुतवून टाकली की सवय नाहीशी झाली...डाँक्टर बोलले. महाराज हसत म्हणाले " मग फार छान झालं , पुन्हा व्यसनात पडू नका . मी कल्याण करीन".असा शब्द दिला. पुढे या शब्दाला जागत महाराजांनी डाँक्टर काटे यांच्या मुलाला १५०० फी भरून शिकवायला पाठवले तो ही डाँक्टर झाला. काट्यांचे दोन्ही मुलींची लग्न लावून दिलीत. घर बक्षिस दिले. डाँक्टर सदगदीत होऊन म्हणाले " दिल्या शब्दाप्रमाणे महाराजांनी माझ कल्याण केल "......ही हकीकत काय दर्शवते. व्यसनमुक्तीचा एक अनोखा प्रयोग आहे हा. गुणी माणसे व्यसनापायी जीव गमावतात व नुकसान समाजाचे होत असते. माणूस पापी नसतो तर त्याच्या सवयी वाईट असतात. त्या सवयी प्रेमाने व विश्वासाने मोडायच्या असतात. तो माणूस " पुन्हा परत मिळवायचा " हा एक कृती कार्यक्रम असतो. एक अनोखा प्रयोग असतो.*

एका वाईट गोष्टी वरून सरसकट माणूस वाईट असे मुल्यमापन करु नये. माणूस बदलू शकतो. वाल्या दरोडेखैराचा वाल्मिकी बनतो अन् रामायण हे काव्य लिहितो हे उदाहरण पुरेसे आहे. गरज असते ती " रत्ने पारखण्याची ". एकदा पारखले की मग त्याला समुद्राच्या तळाशी पडू द्यायच नाही. त्याला अलगद वर आणायच. त्याच्या तेजाने सर्वसामान्य जणांना मोहरुन टाकायच. अर्थात जनकल्याणार्थ गुणीजनांना प्रेमाने व विश्वासाने जवळ ठेवावे....शाहूचरित्र हेच तर सांगते..

*!! दोष देणे सोपे असते...महत्त्वाचे असते तो दोष घालवण्याकरता आपला प्रेमाचा हातं पुढे करणे !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

Sunday, September 3, 2017

शाहूचरित्र ....काय शिकविते ?? ( भाग २५ )

राज्यकर्ते वर्ग जरी सत्ता हाती राखत असला तरी ती सत्ता प्रामुख्याने चालते ती प्रशासनातील लोकांच्या कामावर. राजा निर्दयी असला तर मग प्रशासनाचि मुजोरी कुणी विचारावी ? जणू आपणच राज्यकर्ते आहोत अशा थाटात सारा व्यवहार चालू असतै. राजा जर आळशी व बिनघोर असला तर मग प्रश्नच नाही. रयतेने दोन्ही हाताने ठोकत बसण्याशिवाय उपाय नसतो. पण राजा जर कार्यक्षम असला तर तो स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनावर आपली पकड ठेवतो. त्यातुनही काही कामचुकार निघले की मग त्यांच्यावर राजाची वक्रदृष्टी ठरलेलीच. शाहूराजा हा कार्यक्षम राजा होता. त्यांनी एका अधिकाऱ्याला कसा धडा शिकवला हे पाहण्यासारखे आहे.

*बाळासाहेब गायकवाड ..हे महाराजांच्या विशेष मर्जीताले.महाराज गायकवाडांशी नोकर या नात्यापेक्षा मित्र या नात्याने वागवित. गायकवाड एकदा कचेरीत असताना त्यांना घेऊन बाहेर जायच म्हणून महाराज कचेरीत गेले. पण आपण फारच कामात आहोत हा ढंग आणण्यासाठी त्यांनी महाराजांना तिष्ठत बसवले. थोड्या वेळानं बाहेर येऊन " फार कामे होती महाराज . प्रत्येक काम बघितल्याशिवाय सही करता येत नाही " अस सांगू लागले. महाराज हे सारे कारकुनी डावपेच माहिती असणारे होते. दुसऱ्या दिवशी महाराजांनी गायकवाडांच्या हाताखालच्या कारकुनाला एकटेच बोलवले आणि सह्यांच्या कामात एक कागद ढकलून यांवर सही घेऊन यायला सांगितलं. कारकुनाने काम फत्ते केले. गायकवाड महाराजांकडे येताच महाराजांनी तो अलगद ढकललेला कागद बाहेर काढला की ज्यावर गायकवाड यांनी सही केली होती. तो कागद बीभत्स लावण्यांचा होता.....काय शिकावे बरं यातून ?? मित्रत्वाचे नाते असले तरीही आपल्या अंगीकृत कामात जो कामचुकार वागतो त्याला धडा कसा घालून द्यावा याचे हे उत्तम उदाहरण आहे. अधिकारी वर्गाची चापलूसी , कामाचे ढिग उपसत असल्याचा बहाणा , काम करुन करुन पुरते थकून गेल्याचे नाटक आदी गोष्टी जर राजाला ठाऊक नसाल्या तर अधिकारी मुजोर होतो व जनकल्याण साधू शकत नाही . अशा अधिकाऱ्यांना वेळीच जागा दाखवावी लागते. कारण अधिकार कुचकामी तर प्रशासन बेफिकीर , प्रशासन बेफिकीर तर जनता उघड्यावर , जर जनता उघड्यावर तर राजाने कसला ढोल वाजवावा ?? याकरिताच वेळोवेळी प्रशासनाची कसोटी पहावी लागते.*

आपल्या आजकालचे राज्यकर्ते एकेकदा असा आव आणतात खरा. " मंत्री महोदयांची अचानक भेट " असा एक मथळा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये झळकतो आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा येरे माझ्या मागल्या हा अनुभव सर्वसामान्य लोकांच्या वाट्याला येतो. असे का होते ?? कारण हे की शाहूराजा व आजकालचे राज्यकर्ते यांच्यातील मुलभूत फरक. शाहूराजाच्या पाठी त्याची रयत अखंड उभी होती. रयातेचा राजावर विश्वास होता. अन् राजाला हा विश्वास कायम ठेवायला हवा याची यथार्थ जाण होती. म्हणून तर गायकवाड सुधारु शकले. आजकालच्या राज्यकर्ते वर्गाबद्दल रयतेची ही विश्वासाची भावनाच गायब झालीय. परिणाम ...समौर आहे. म्हणून राजा असणाऱ्या प्रत्येकाने जनतेच्या विश्वासाला कायम पात्र राहण्यासाठी दक्ष असावे लागते ...शाहूचरित्र हेच तर शिकवते

*!! जनकल्याणाची आस असेल जर हृदयात..जनता ठेवेल तुम्हाला आपल्या काळजात !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...