Saturday, August 26, 2017

शाहूचरित्र .....काय शिकविते ?? ( भाग २१ )

शाहूराजाच्या गोष्टी म्हणजे अगदी आगळ्यावेगळ्याच.एक महत्त्वाची व त्यातही आजच्या घडीला अत्यंत आवश्यक अशी गोष्ट मी इथे आता नोंदवतोय. पुत्रप्रेमाने आंधळे झालेल्या लोकांची जगभरात कमी नाही. अशा प्रेमाला आपण थेट धृतराष्ट्री प्रेम असेच संबोधतो. खरं तर या प्रेमातून गरीब अथवा श्रीमंत असा सुटा जुमला नाहीय. पण त्यातही काही महत्त्वाचे फरक असतात हे कबुल. बाप जर राजा , सरदार , मोठा सरकारी अधिकारी अथवा राजकीय भाषेत लोकप्रतिनिधी असेल तर मग त्या मुलावरील धृतराष्ट्र प्रेमाला गणतीच नसते हो. या प्रेमापायीच छोटी छोटी महाभारत आजही आपल्या आजूबाजूला घडत असल्याचे आपण पहात आसतो. शाहूराजाची एक वेगळी दृष्टी समोर आणणारी ही गोष्ट ऐकाच...

*शाहूपुरी..हि व्यापारी बाजरपेठ शाहूराजाने वसवली.महाराज हे कायम चौफेर व चौकस नजर राखून पाहत आसत. बळवंतराव गोरे हे इसम महाराजाकडे नोकर होते. पण त्याची व्यापारी कामात हुशारी फार होती . माणूस अत्यंत प्रामाणिक होता. बळवंतरावाना महाराजांनी व्यापारी पेठेत अडत दुकान घालून दिले. धंदा भरभराटीला आला. महाराज स्वतः काही खाजगी रकमा बळवतरावाच्या दुकानात ठेवीत . इतका विश्वास त्याच्यावर होता. महाराजांनी त्यांची एकदा परीक्षाही घेतली होती प्रामाणिकपणाची. बळवंताराव त्यात पास होताच महाराजांनी त्यांची हूशारी , पत आणि प्रामाणिकपणा पाहून खुद्द युवराजांना बळवंतरावाच्या दुकानि नियमितपणे जाऊन शिक्षण घेण्याची आज्ञा केली. विशेष म्हणजे बळवतरावाना स्पष्ट सुनवले की " शिकवताना हयगय करायची नाही. टंगळमगळ केल्यास थपडा देऊन ताळ्यावर आणायचे. मोठ्यांची मुले म्हणून राग कसे धरु ही भावना टाकून द्यायची " यापुढे जाऊन बळवतरावाचे हाताखाली शिकून तयार झाल्यावर महाराजांनी युवराजांना प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी आर. बी. एन. नावाचे अडत दुकान घालून दिले. व धाकट्याना एस. ए. बी. ही स्टेशनरी कंपनी काढून दिली.....ही गोष्ट काय दर्शवते ?? मला असे प्रामाणिकपणे वाटते की युवराजाना व्यापारी बनवायचा हेतू दुय्यम होता पण त्यांना " जनतेच्या हिताचा कारभार ",शिकवण्याची एक युक्ती होती. जै माणूस महाराजांचा कधीकाळी नोकर होता त्यांच्याच हाताखाली आपल्या मुलाला शिकायला पाठवून महाराज मार्क्सवादी भाषेत मुलांना " डी - क्लास " बनवू इच्छित होते.सरंजामी खोटा मानमरातब ही आयुष्याची खरी पुंजी नसते तर हुशारी व प्रामाणिकपणा हीच महत्त्वाची पुंजी असते असा धडाच जणू महाराजांनी घालून दिला.*

आजकालचे आमचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी यातून काही बोध घेतील का ?? सध्याच्या आमदार अथवा खासदार लोकांच्या मुलांना जणू आपण " चिरकालाचे युवराज असून , जनता म्हणजे आपली बटीक होय " अशा अविर्भावातच ते वागत असतात. छोटी छोटी महाभारत यातूनच घाडतात. आपल्या मुलाला सैराटमधील " प्रिन्स " होऊ द्यायचा नसेल तर त्याला गुणीजनांच्या हाताखाली द्या व त्या गुणीजनांना योग्य सन्मान द्या ..हेच शाहूचरित्र शिकवते..

*!! हुशारी व प्रामाणिकपणा...हेच " जीवन " घडवतात ...माणूस घडवतात !!*

उमेश सूर्यवंशी  ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
Thanks !

Thursday, August 24, 2017

शाहूचरित्र ...काय सांगते ?? ( भाग २० )

राजा असणाऱ्या माणसाला विवेकबुध्दी आवश्यक असतेच पण त्याचबरोबर महत्त्वाच्या प्रश्नावर विधायक युक्तिवाद करण्याचे कौशल्यही असावे लागते. हे जनहितार्थ केलेले युक्तिवाद भविष्यात फार मोठे परिवर्तनाच्या जागा तयार करत असतात. आजची परिवर्तनवादी चळवव बरेचदा या भूतकाळातील महामानवांनी केलेल्या विधायक कामाच्या जोरावर अवलंबून असते त्याचे कारण हेच. राजा आणि त्यातही तो आधुनिक विचारांचा लाभला तर समाज सुसंस्कृत बनायला अधिक अवकाश मिळतो. अशीच एक घटना पाहूया...

*अंबाबाई मंदीर...हे देशप्रसिध्द आहे. या मंदिरात कारंजाचे दोन हौद होते. एक हौद ब्राह्मण समाजाचा तर दुसरा ब्राम्हणेतरांचा. सत्यशोधक चळवळ ही त्याकाळी जोमात होती. दासराम ..हे सत्यशोधक समाजाचे निर्भीड कृतीशील कार्यकर्ते. माणसामाणसातील अंतर कमी करणे म्हणजे विषमता नष्ट करणे होय. हे दोन हौद म्हणजे विषमतेची नांदी व समानतेची विल्हेवाटीचे प्रतिकच होते जणू. सत्यशोधक दासरामांनी एकदा जाहीर केले की ब्राह्मण समाजाच्या वेगळ्या हौदात मी बुडी मारणार. ठरविल्याप्रमाणे दासराम यांनी " छत्रपती शाहू महाराज की जय " अशी घौषणा देत या हौदात उडी घेतली. ब्राह्मण समाज खवळला. हौद अशुद्ध झाला म्हणून गौमूत्र शिंपडून हौद शुद्ध करून घेतला. जनसामान्य हा सारा प्रकार पाहत होते. त्या महिन्यात एकादशी होती. पंचगंगा नदीवरही ब्राम्हण समजाकरता एक मोठा घाट " राखीव " होता. लोकांच्या झुंडीच्या झुंडी एकादशीला आंघोळ करण्यासाठी नदीवर पोचल्या. आणि गंमत म्हणजे राखीव असणाऱ्या ब्राम्हण घाटावरच आंघोळ करु लागले. पुन्हा ब्राम्हण वर्ग खवळला. तक्रार करण्यासाठी ते शाहूराजाकडे गेले. महाराज मोठे हूशार. त्यांनी स्पष्ट सांगितले " जशी तुम्ही हौदाची शुध्दी केली , तशीच नदीचीही करा ". ब्राम्हण समाज जे समजायच ते कळून चुकला.....ही घटना ऐतिहासिक आहे. विषमता दूर करण्यासाठी जी कृती दासरामानी केली होती तिला थेट समर्थन महाराजांनी केले होते हे दिसून येते. भेदाभेद ठेवू इच्छिणाऱ्या ब्राम्हण वर्गाला " आता माझ्या राज्यात हे थेरं चालणार नाहीत " असा सूचक पण थेट इशारा महाराज देऊन जातात.सत्यशोधक दासराम या विवेकी कृतीने इतिहासात अजरामर झालेत. शाहूराजानी विधायक कार्याला विवेकी समर्थन देत आपली ऐतिहासिक कामगिरी चोख बजावली.*

नेहमीच काही सरळ मार्गाने विधायक कार्य पार पडेल अस नाही . तर कधीकधी काही " अवचित घटना " घडवून आणावी लागते. विवेकाची अर्थात समानतेची प्रस्थापना समाजात अशा मार्गानेही होत आली आहे. आणि स्पष्ट सांगायचे तर हे मार्ग अविवेकी नव्हेत. एकाच चष्म्यातून सारे जग पाहणे म्हणजे चळवळ व रणनीती न कळण्यासारखे आहे. " आम्ही कोणते शस्त्र वापरावे हे आमचा शत्रू ठरवतो " असे लेनिन बोलला होता. शाहूचरित्र तर दुसरे काय सांगते हो...

*!! विषमता नष्ट करण्यासाठी ...काही मार्ग असतात निराळे...पण समजू नका त्यांना , विवेकी मार्गा पेक्षा ..वेगळे !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...